Sunday, August 12, 2012

दिल्ली अनुभव क्रमांक ५) :राजेश पायलट आणी काश्मीर

दिल्ली मला जेव्हा नवी होती ,तेव्हा म्हणजे १९९६ चा हा किस्सा आहे.ज्ञान प्रबोधिनीच्या १० कार्यकर्त्या समवेत मी काश्मीर अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो...काश्मीर तेव्हा भीषण परिस्थितीत होते...देशी-परदेशी पत्रकारांनी पण तेथे जाणे जवळ जवळ बंद केले होते..अशा वेळी आम्ही १२ दिवस जीव धोक्यात घालून सामन्यापासून अतिरेकी नेत्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधून दिल्लीत आल
ो.गृह राज्य मंत्री राजेश पायलट यांची भेट सायंकाळी घरी मिळाली .त्यांना आमच्या कडील माहितीचे गांभीर्य समजले .त्यांनी तातडीने त्यांच्या ब्लेक केट कमांडो समवेत व्हेन मधून नॉर्थ ब्लोक मध्ये त्यांच्या कार्यालयात तरुण उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडे पाठवले...ब्लेक केट कमांडो हि संकल्पनां तेव्हा नवीन होती...आम्हाला भलतेच अप्रूप वाटले ...! नॉर्थ ब्लोक मध्ये त्या अधिकार्याबरोबर खूप चर्चा झाली ...पुन्हा कमांडो समवेत व्हेन मधून राजेश पायलट यांच्या घरी !

...आता अनोळखी कार्यकर्त्यांबाबत अशी संवेदना कोणी दाखवत नाही...
-----------
दिल्ली अनुभव ४)
दिल्ली मध्ये किंचित पाउस पडला कि किंचित दमट पण दिल्लीकरांना आल्हाद दायक वाटणारे वातावरण तयार होते...संसदेतून येणाऱ्या एका माननीय खासदारांची आणी माझी भेट थोडी उशिरा होणार होती ,म्हणून मी सहज गाडी इंडिया गेट कडे वळवली .तर तेथे काळ्या कुळकुळीत गाड्यातून विदेशी वकिलातीची मंडळी आली होती...गाडी मळली नव्हती तरी पुसली जात होती ... बाईट वगेरे सुरु होते...अशा वेळी शाळेतून गमतीखातर इंडिया
गेट वर दफ्तर सह आलेल्या हसऱ्या ३ मुलांना काळ्या गाडीजवळ जाण्याची लहर आली...इंडिया गेट चा हवालदार त्यांना ते करू देणे शक्य नव्हते ....' पळा,नाही तर बदडेन एकेकाला..' असे म्हणून त्यांनी पोरांना हाकलून लावले...मला पंडित नेहरू आठवले ....इंडिया गेट परिसरात लगडलेल्या जांभळाच्या झाडाभोवती जांभळा साठी चढा ओढ -दंगा करणाऱ्या मुलांना हटकनाऱ्या पोलिसाला पंडित नेहरू यांनी तंबी दिलीच ....पण त्यानंतर जांभळांच्या झाडांची संख्या हि वाढली ....परवाच्या भेटीत जर मी पंडित नेहरू किवा परदेशी पाहुणा असतो तर त्या काळ्या कुळकुळीत गाडीतून त्या सामान्य मुलांना राजपथ सैर नक्कीच घडवली असती...(हजारो ख्वाईशे ऐसी कि हर ख्वाईश पर दम निकले...)
-------------
दिल्ली अनुभव क्रमांक ३ )
दिल्ली मध्ये मी पोहोचलो तर दुसर्या दिवशी उप राष्ट्रपती पदाचे मतदान सुरु होणार होते.ते करून सगळे आपापल्या मतदार संघात जाण्याच्या तयारीत होते.त्यातील समविचारी एका खासदार माननीया बरोबर दुपारचे जेवण घेतले.त्या आधी महाराष्ट्र सदन ला वाहिनीच्या पत्रकाराबरोबर गप्पा झाल्या...आदरयुक्त काळजीने त्यांना विचारले ,' आपल्या मराठी नेत्यांना मंत्री पदाची जबाबदारी झेपेल ना ? ' त्यावर मस्त उत्तर आले ,' मनमोहन सिंह यांना पंत प्रधान पद झेपते मग आपल्याला अमके तमके पद का झेपणार नाही ? ' ....मला आवडला हा युक्तिवाद !
---------------------
दिल्ली अनुभव क्रमांक २)
पुणे विमानतळावरील माननीय खासदारांच्या माजुर्ड्या अनुभवानंतर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना दिल्लीत भेटण्याचा प्रसंग आला. नुकताच पुणे स्फोटांच्या पार्श्व भूमीवर पुण्यात सी सी टीव्ही बसविण्यासाठी त्यांनी लोक प्रतिनिधींची बैठक आणी निधी ची तरतूद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.त्या दरम्यान त्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या तेव्हा गाडी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर लावली ...सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या थाटात पोर्च मध्ये घेतली नाही...आणी त्या चालकाला तसे कधी करू देत नाहीत....पूर्ण तपासणी करण्याचा आग्रह धरतात ,सर्व पूर्तता झाल्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे आत जातात..असा साधे पणा दुर्मिळच !
----------------
दिल्ली अनुभव ! : क्रमांक १)
पुण्यावरून जाताना विमानतळावर शुभ्र सफारी..शुभ्र स्पोर्ट शु परिधान करून चेहऱ्यावर किंचित माजुर्डा ,कोरा भाव घेवून एक खासदार बोर्डिंग पास कौंटर जवळ आले...त्यांना हवी असलेली सीट मिळाली नाही म्हणून त्रागा करू लागले..तर तसा काही निरोप मिळाला नसल्याचे उत्तर छान इंग्रजीत मणिपुरी कर्मचारी नम्रतेने मुलगी सांगू लागली...तरी खासदार महाशय हटेनात ...मोठा राष्ट्रीय अपराध त्या विम
ान कंपनी कडून घडल्याचा त्यांचा अविर्व्भाव होता...त्या अमक्या तमक्या ला निरोप दिला होता ना...असे ते बडबंडले...त्या वर तो अमका तमका आमच्या विमान कंपनीत कामच करत नसल्याचे मणिपुरी सुंदरीने कळकळीने सांगितले...तरी माजुर्डे खासदार म्हणाले...'यह किसको बताऊ बोलो...उसकी खटिया खडी कर देता हू ...! ' खोट्या प्रतिष्ठेचे बळी असणारे असे खासदार दिल्लीत नेमके काय करत असतील ?
----------


Tuesday, July 3, 2012

माझेगुरु:my honorable teachers ! ( a complete note on Guru pournima )



(आज सकाळी मी घाईत लिहिलेल्या 'माझे गुरु ' या नोट चे कौतुक आदरणीय डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी मेल पाठवून केले.'सहज सुंदर लिहिणे तुमच्याकडून शिकावे ' अशा त्यांच्या शब्दाने फुशारून गेल्याने ,उर्वरित गुरुना आठवून आता शांतपणे हि नोट पूर्ण करीत आणली आहे...)

गुरु पौर्णिमा म्हटले कि मला अनेक गुरु तेही प्रात: स्मरणीय असे आठवतात : ग्रामीण ,अतिदुर्गम भागात शिक्षिका असलेल्या  माझ्या  आई कडून मी सुंदर अक्षर,लेखन,वक्तृत्व ,मानवता,पत्र व्यवहार,जनसंपर्क आणि टोकाची सहनशीलता   शिकलो. (पण पहाटे चार ला उठून काम करायला शिकलो नाही ...)

वडलांकडून अथर्वशीर्ष शिकलो...

मित्रांकडून पोहायला वेण्णा  नदीत-  आणी नंतर आपोआप कण्हेर धरणात   कसा शिकलो हे आता आठवत सुद्धा नाही... 
हुंद्रे सर रविवारी साताऱ्याहून खास एलिमेंटरी चा तास घ्यायला यायचे ,त्यांच्याकडून वाटर कलर पेंटिंग शिकलो..
तासाला ५० पैसे लाच देवून एका मित्राकडून सायकल शिकलो..

एन.सी.सी.मध्ये जाऊन शिस्तीचे,इस्त्रीचे ,बंदुकीचे पहिले धडे शिकलो..

अकरावीत भेटायला आलेल्या जयंत देशपांडे ,अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या कडून अ.भा.वी.प .च्या माध्यमातून संगठन ,जिव्हाळा शिकलो..
गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकवणारे पण इतिहास -पर्यटनाचे जाणकार प्र.के.घाणेकर आठवतात.चहा साठी पाने लागतात,त्याची लागवड करायला टेकड्यांची मूळ झाडे तोडून त्या बोडक्या केल्या जातात,म्हणून आयुष्भर ते चहा पासून दूर राहिले.पर्यावरणाचा नाश होतो म्हणून पेट्रोल चे वाहन स्वत घेतले नाही.आयुष्यभर सायकल चालवली. त्यांच्याकडून निर्मळ निग्रह शिकलो .वनस्पती शास्त्राच्या दुसऱ्या  प्राध्यापक प्रा.हेमा साने आजही पुण्यात विजे शिवाय राहतात.त्यांच्याकडून साधेपणा शिकलो.

पत्रकारीतेत्च्या अभ्यासक्रमात नसताना डी.टी.पी.चा समावेश करणाऱ्या डॉ.किरण ठाकूर यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह शिकलो.मंगेश पाठक यांच्याकडून गोळीबंद लेख लिहायला ,विषय शोधायला शिकलो...विजय ठोंबरे यांच्या कडून समोरच्याशी आत्मीयतेने ,हळुवार कसे बोलावे हे शिकलो...

'प्रचीती ' (ज्ञान प्रबोधिनी )तील आमचे गुरु डॉ.विवेक कुलकर्णी यांनी नियोजन बद्ध काम ,अभ्यासदौरे करायला लावले ( त्यातून स्पर्धा परीक्षा केंद्र ,साखरशाळा ,ग्रामीण प्रज्ञा विकास,संघटन ,संवाद,झोपडपट्टीतील काम आम्ही केले .'विकसन हेच तत्वज्ञान -समन्वय हीच कार्यपद्धती ' हे शिकलो.) .
आर्थिक अडचणीत असताना हि मार्गक्रमण सुरु ठेवावे.दिवाळखोर माणसातील 'माणसाला' कधी दूर करू नये, हे शिरीष कुलकर्णी-वर्षा माडगुळकर यांच्या कडून मी शिकलो...

अविनाश धर्माधिकारी हे तर ज्ञानाचा सागरच आहेत. इतिहासाची भव्यता,नागरिक चळवळीची दीक्षा ,वक्तृत्व त्यांच्याकडून शिकावी..पण मी आत्मविश्वास शिकलो.नंतर अनिल शिदोरे यांनी ' कार्य शैली ' त्यांच्या स्तंभातून ,पुस्तकातून शिकवली...  खासदार अड.वंदना चव्हाण यांच्या कडून  शांतपणा-समन्वय-चिकाटी-अभ्यास , ' 'स्टेट्स मन शिप 'या गुणांचा नकळत अभ्यास करतो आहे...

पी.ए.इनामदार यांच्याकडून मी मल्टी टास्क शिकू पाहत आहे... मराठी साहित्यातील अनेक दिग्गजांकडून ,वृत्तपत्र वाचनातून मी भाषा प्रभुत्व शिकलो...श्रीराम पचिंद्रे यांच्याकडून मराठीचा संभाषण आग्रह शिकलो. .फोटोग्राफी तर निसर्गाकडे पाहत शिकलो...
काश्मीर मध्ये जाऊन मेहमान  नवाजी शिकलो...
येत गेलेल्या अडचणीतून ,सोडवणूक शिकलो...

तरी अजून बरेच शिकायचे राहिले आहे .!  

हनमंतराव गायकवाड यांच्या कडून व्यवसाय वृद्धी शिकलो नाही . माझ्या सासूबाई, यांच्याकडून नियोजनबद्ध पंगत,सहलीची तयारी  शिकायचे राहिले आहे,तर सासरयांकडून आबाल वृद्धांशी विनाविषय गप्पा रंगविण्याची हातोटी शिकलो नाही....प्रिय पत्नी गौरी कडून अप्रतिम चवीचा ,नीट-नेटका स्वयंपाक आणी टाप -टीप शिकलो नाही !

माझ्यामागून माझी कार्यालयीन  सहकारी सारिका एक्सेल शिकली ,पण मी शिकलो नाही..कोरल ड्रो ,फोटोशोप सगळेच मागे पडले आहे.अनिल देशमुख कडून स्कूटर शिकलो तर मित्र जब्बार कडून मारुती शिकलो..स्कूटर येते ,पण अजून मोटार सायकल शिकलो नाही.

आपण अजून अडाणी आहोत,हे कबूल करायची हि एक नम्र संधी ! (सब कुच्ह  सिखा हमने ,ना सिखी होशियारी ! )

परिस्थिती ,भोवताल तर रोजच काही शिकवत असते ... या गुरु जनांमुळेच आपण असतो....म्हणून ,सर्व ज्ञात -अज्ञात गुरुना वंदन... 

आपणास हि गुरु पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा !