भर दुपारी उन्ह जाळ काढत असताना एका ठिकाणी निघालो होतो . मोठा सिग्नल होता .
हमखास भिकारी असतात तिथे .
सवयीने मी काही तरी काढून त्यांना देत असतोच . ( आणि बहुतेक वेळा मला माझ्या व्यवसायाची बिले काढताना 'या ' मंडळींचीच आठवण येत असते ! जो इतरांकडून पैसे घेतो ,तो याचकच असतो बहुतेक वेळा )
आज चित्र वेगळे होते .
सूर्य पेटलेला असताना एक काळी कभिन्न आणि अपंग जोडी भिक मागत होती . त्यातील पुरुष तरुणाच्या अंगावर पुरेसे कपडे हि नव्हते . काहीना किळस यावी . . काहीना कणव यावी अशी वेळ होती .
काही जण एखादे नाणे देत होते ,काही जण हुसकावून लावत होते .
दुचाकी वरून निघालेल्या पण सिग्नलला थांबलेल्या दोन तरुणांना त्यांनी भिक मागितली . आता ते कचकचीत शिवी हासडणार . . हाकलणार अशी माझी सवयीची समजूत होती
पण दुचाकीच्या मागे पाण्याची बाटली घेवून बसलेल्या तरुणाने काही न बोलता . . . त्या काळ्या कभिन्न दाम्पत्य अपंग वेडसर मूर्तीकडे शांत -कोऱ्या नजरेने नजरेने पाहिले
आणि दुसऱ्या क्षणी काही कळायच्या आत . .
ती थंड मृगजळ वाटणारी पाण्याची बाटली काळ्या कभिन्न वेडसर भिकारी दाम्पत्याच्या हातात त्या तरुणाने दिली होती !
सुखद धक्का होता मला . .
सूर्य ,उन्हे -दुष्काळ कितीही धगधगला तरी माणुसकीचा पाझर आटू न देणे ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे ना ?