Monday, December 15, 2014

कार्यकर्त्यानो सलाम ! ( 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' )
---------------------------------
राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा निवडणुकीत लढलेले -जिंकलेले -थोडक्या मतांसाठी हरलेले अशा सर्व ५ उमेदवारांचा सत्कार समारंभ पुण्यात १४ नोव्हेंबर रोजी १ वाजता होत आहे . वर्धमान लॉन्स ,गंगाधाम चौक ,मार्केट यार्ड जवळ ,पुणे येथे होत आहे .
या तयारीसाठी विभागवार मेळावे होत आहेत . आज बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला . मी प्रवक्ता झाल्यानंतर प्रथमच पक्षाच्या मेळाव्यात बोललो . निवडणूक प्रचारादरम्यान प्रवास करताना अपघाती मृत्यू झालेल्या प्रवक्ते मोहन अडसूळ यांना आधी श्रद्धांजली अर्पण केली
त्याआधी १७ ,१३ वर्षे महादेव जानकर यांच्यासोबत खडतर कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचे 'दर्शन ' घेता आले . बोलता आले ,ऐकता आले . . खूप बरे वाटले . कोणी महादेव जानकर कसे कष्ट उपसत एस टी stand वर झोपत ,मिळेल ते खाऊन फिरत ,स्वताचा संसार करायचा नाही ,समाजाच्या हिताला वाहून घ्यायचे हि प्रतिज्ञा करून ,पक्ष स्थापनेनंतर ११ वर्षांनी 'शासन कर्ती जमात ','शासन कर्ता समाज ' ,'शासन कर्ता पक्ष ' या पातळीवर पोचले . धनगर समाज आरक्षण आणि सत्ता यातून प्रगतीपथावर गेला पाहिजे पण अंतिम ध्येय्य काय तर 'सत्य शोधन -समाज प्रबोधन -राष्ट्र संघटन ' हा व्यापक विचार बळकट केला .
खस्ता खात पक्ष उभारणारे अनेक पायाचे दगड देवासारखे भेटले . दिसायला सगळे सावळे विठ्ठल.
. दादासाहेब केसकर तर शेतीपूरक व्यवसायातून येणारी कमाई फक्त पक्षाच्या वाढीसाठी वाहत आले . महानवर ,संपतराव टकले ,पुंडलीक्मामा काळे ,कोळसे -पाटील ,बजरंग खटके . . नावे घ्यावीत तितकी कमी .
अनेकांना जानकर साहेबाना मंत्रिपद मिळाले तर तो समाजाच्या सर्वोच्च सन्मानाचा क्षण वाटत आहे . 'आम्ही ,जानकर ,,दिलीप तुपे ,बजरंग खटके सतत निवडणुका लढायचो ,आणि सतत पराभूत व्हायचो ,पराभव नवीन नव्हता . पण हार कधीच मानली नाही ' असे खटके सांगत होते
अनेकांना पक्षाचा १४ वर्षे वनवास संपला ,जानकर यांच्यासारख्या त्यागी माणसाचा वनवास संपला असे वाटत होते आणि ते भावनांना वाट करून देत होते .
धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि एका मागास राहिलेल्या समाजाला लोकशाही मार्गाच्या प्रगतीची कवाडे खुली होतील ,त्यात भाजपा मदत करेल असे तर सर्वाना वाटत होते
नवाच असलेल्या आणि तथाकथित उच्च वर्णीय असलेल्या म्या पामर प्रवक्त्याने काय बोलावे अशा प्रसंगी ?
' संघर्ष संपलेला नाही मात्र रचनेला सुरुवात करायला हवी . शासन कर्ती जमात -समाज -पक्ष म्हणून आपण हक्क जरूर मागितले पाहिजेत पण नव्या जबाबदाऱ्याना सामोरे गेले पाहिजे . नवी कौशल्ये ,नव्या व्यवस्था -संरचना आत्मसात करून नव्या व्यापक उद्दिष्टांकडे धाव घेतली पाहिजे ' असे सांगितले .
सर्व बांधवाना बहुदा ते आवडले असावे . कारण मेळावा संपल्यावर १५ मिनिटे माझ्याबरोबर अनेक जणांचे ' फोटो सेशन ' चालले !
मी प्रवक्ता झालो तेव्हा शनिवार वाड्यावर dd news राष्ट्रीय वाहिनीवर पुण्यातील सर्व पक्षाच्या प्रवक्त्या समवेत निवडणूक विषयक 'जनवाणी ' कार्यक्रमात सहभागी झालो होतो . त्याला मी लोकशाही शाळेचा 'पहिला दिवस ' संबोधले होते
आज राष्ट्रीय समाज पक्ष मेळाव्यात अनुभवलेला दिवस हा 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' माझ्यासाठी खूप शिकवून जाणारा ,ज्याला तळागाळातील आपण म्हणतो अशा जनता -जनार्दना समवेत सत्कारणी लागलेला . .
जय हो !
एक पोस्ट चिमणराव कदम यांच्यासाठी . .
--------------------------------
चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षाला साजेसा अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्वांचे पर्व संपले . अर्ध चंद्रकोर लावून ,पांढरे धोप कपडे घालून सूर्याजीराव तथा चिमणराव कदम बाहेर पडले कि त्यांच्या तेज नजरेच्या आणि वाणीच्या पट्ट्यात शक्यतो आपण येवू नये अशी काळजी घ्यावी लागायची . फलटण मध्ये ' कार्यकर्ते कमी आणि विविध पक्षीय नेते जास्त ' अशी अवस्था . त्या अवस्थेतून त्यांनी विधानसभेवर निवडून येत सभागृह गाजवले . 1980 ते १९९५ पर्यंत हे वादळ राजकारणात घोंघावत होते . (एकदा सातारी राजकारण्यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढण्यासाठी थेट इंदिराजी च्या समोर दिल्लीत उभे केले आणि कदम यांनी त्यांना विनम्र नकार दिला तो यशवंतराव यांच्या आदरापोटी ! अशी आठवण आता कॉंग्रेस कार्यकर्ते काढत असल्याचे परवा बाबुराव शिंदे यांनी whats ap सांगितले . )
कृष्णा खोऱ्याचे पाणी पळवणारे नेते त्यांच्या शाब्दिक असुडांचे बळी ठरत . बारामतीचे शरद पवार आणि फलटणचे चिमणराव कदम यांचा लढा भिन्न व्यक्तिमत्व ,भिन्न विचारसरणी चा होताच पण बांधावरचा देखील होता . कृष्णा खोऱ्याच्या आणि करारांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ब्रिटीश लायब्ररीत कसे संदर्भ मिळवले हे चिमणराव रंगवून सांगत . टाटा इश्टेट गाडीत बसून -झोपून ते फलटण -मुंबई ,फलटण -पुणे ,फलटण -नागपूर असा प्रवास करायचे
अर्थात अशी अभ्यास करायची कॉंग्रेस ला सवय नव्हतीच . त्यामुळेच ते मुलुखमैदानी आणि मुलुखावेगळे ठरत . २००४ साली सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली . शिरीष चिटणीस आणि श्रीकांत कात्रे या मित्रांनी माझी,मी पुण्याला स्थायिक असताना देखील आणि चिमण रावांची मोट बांधली ,मला त्यांचे निवडणूक प्रसिद्धीप्रमुख केले आणि मुलुखमैदानी तोफेच्या तोंडी दिले !
laptop ,mobile ,digital कॅमेरा ,email यातील काहीच त्या परिसरात नव्हते त्यावेळी (म्हणजे दहा वर्षापूर्वी ) लिहिलेले वृत्तांत पेपरच्या कार्यालयात पोचणे हे रोजचे दिव्य होते ,
आपला प्रसिद्धीप्रमुख ,माध्यम सल्लागार म्हणजे काय हे सुरुवातीला चार दिवस त्यांच्या पचनी पडले नाही . ' तुम्ही माझी भाषणे लिहून पेपरला पाठवणार म्हणजे 'टपाल्या ' सारखे काम करणार ' असे ते खास शैलीत हिणवत ! त्यांची जहरी टीका ऐकून माणसे आत्महत्या कशी करीत नसत किवा चिमण रावांची हत्या कशी करत नसत याचे आश्चर्य मला वाटे .
पण ,नंतर एकाच गाडीत रोज आम्ही बरोबर राहून काम केल्यावर त्यांच्या ध्यानी 'माध्यम सल्लागार ' हा प्रकार आला . आणि मुलुखमैदानी भाषणे झाल्यावर गाडीत बसल्यावर मृदू आवाजात ते मला भाषण कसे झाले ,याचा 'feedback ' घेत . एकाच डब्यातील भाजी -पोळी आम्ही दुपारी कोणत्यातरी झाडाच्या सावलीत खात असू . अतिशय आरोग्यकारक भाजी ,पोळी चा डबा असे तो . दिवसभर वणवण फिरताना घसा खराब होऊ नये म्हणून पाण्याऐवजी कॉफी पीत असत ते .
सर्व प्रचार यंत्रणा एक हाती सांभाळली त्यांनी ! स्वतःच सकाळी ११ पर्यंत सर्वांना हाकून ते नियोजन करत आणि मग गाड्या प्रचाराला निघत .
काँग्रेस चे बंडखोर उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते ,लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी होती . चिमणराव कदम यांची वाट नेहमीप्रमाणे कठीण होती . त्यात निवडणूक काळात उन्हाळा आणि दुष्काळ होता . चारा छावण्या ठीक ठिकाणी पडल्या होत्या . आपली जनावरे पाणी असलेल्या पावण्याकडे खुद्द चिमणरावांनी पण धाडून दिली होती . 'यशवंत परंपरा ' चालवणे आणि लोकसभेत भांडून हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी सातारा दुष्काळी भागाला (दहिवडी -खटाव -माण -फलटण -खंडाळा ) मिळवून देणे हा त्यांचा नारा होता .
बुडत्या काँग्रेस मधून तेव्हा उंदरासारखे नेते बाहेर पळत होते ,अशा वेळी ' मी उंदीर नाही ,वाघ आहे , वेळप्रसंगी कॉंग्रेस चे बुडणारे अख्खे जहाज खेचायची ताकद माझ्या अंगात आहे ,असे ते डोळे फिरवून म्हणत ! आणि रोमांच उभे करीत . अगदी जिगरबाज माणूस . काँग्रेस च्या पचनी न पडलेला आणि जिभेच्या पट्ट्याने सर्वांना घायाळ करीत स्वतःच घायाळ झालेला .
चिमणरावांच्या पत्नी मात्र चिमणराव यांच्या भाषणाच्या बातम्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारख्या लिहा असे म्हणत ! कदम यांचे उजवे हात असलेले सहकारी अच्युतराव खलाटे मात्र चिमण राव कदम यांच्या उलट स्वभावाचे . माणसे जोडणारे आणि मुलायम बोलणारे . त्यांनी मात्र २००४ निवडणूक संपली तरी संपर्क ठेवला . ही राजकारणातील जुनी पिढी . मागे पडली ती पडलीच .
आता सातारा वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या नेत्यांमुळे ओळखला जातो
मात्र ,त्यातील एकही जण 'यशवंत परंपरा ' चालविण्यासाठी मी निवडणूक लढवतोय असे म्हणत नाही . सभ्यतेच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण एव्हढाच काय तो नियमाला अपवाद . कॉंग्रेसचे , साताऱ्याचे, यशवंतराव चव्हाण यांचे आणि चिमणराव कदम यांचे दुर्दैव हेच !
-------------------------
(सोबत :२००४ च्या प्रचारात चिमणराव कदम यांचा माध्यम सल्लागार या नात्याने मी लिहिलेल्या काही बातम्या -मुलाखती . आणि चिमणराव कदम यांच्या प्रचारात सहभागी झालेला -हातात नोटबुक घेवून मुद्दे टिपणारा मी ! )
------------------------------------------


Saturday, March 8, 2014

मानवी मनाचे महाभारत : 'आता मजा येईल ' :एक स्वगत !


------------------------------------------------------
लहानपणी म्हणजे साधारण १० वी  इयत्तेत जाण्या पूर्वी आमच्या गावी मोजक्या लोकांकडे टी व्ही होता . रंगीत  टी  व्ही एक  दोनच  होते . रविवारी महाभारत  बघायला 'भारत  बंद ' करण्याचे  दिवस  होते  ते . माहित  असलेल्या  महाभारतातील  'शिन ' उत्कंठेने  पाहिले  जायचे . खूप  गर्दी  व्हायची  त्या  टी  व्ही  भोवती !

मी  ज्यांच्याकडे रंगीत  महाभारत  पाहायला  जायचो ,त्या घरातील तरुण महाभारत एपिसोड संपला कि न चुकता  म्हणायचा ,' आता  खरी मजा येणारे ' !  म्हणजे पुढच्या  एपिसोड  मध्ये  महाभारत अजून रंगणार  आणि  अजून  पाहायला  मजा येणार . मग  आठवडा  त्या  मजेच्या  प्रतीक्षेत निघून  जायचा .
यथावकाश जमेल तेव्हढी मजा देवून महाभारत संपले .
आज  गावी गेलो कि तो टी  व्ही मालकांच्या  घरातील तरुण भेटतो कुठेतरी .
आणि  वाटते ,कि ,त्याच्या  काय - माझ्या  काय  जगण्यात  'खरी ' मजा अजून  बाकी  आहे . पण 'मजा ' असलेल्या एपिसोड  साठी दर  आठवड्याच्या 'त्या ' दिवसाकडे डोळे लावून  पाहणे  अजून  सुरूच  आहे . . .
(आज सोमवार पासून सुरु  झालेल्या आठवड्यासाठी  सर्वांनाच  शुभेच्छा ! आता  खरी  मजा येणारेय !! )

संडे कब आयेगा ?



रविवार सरला तरी त्याच्या स्मृती सोमवारी रेंगाळत राहतात ..

 जर रविवारी आपण अशा वेगळ्या गोष्टी केल्या कि ज्या आठवडाभर करता येत नाहीत ,तर तो नक्की संस्मरणीय होतो .

मला  खूप रविवार  नंतर अशी संधी  होती .  त्या साठी  शनिवारी  रात्री  ' भाग  मिल्खा    भाग ' सहकुटुंब  पाहिला . ' मटार  भात ' हि शनिवार  रात्रीची  'आपली  आवड ' असल्याने  आदित्य ने त्यावर  ' भात  मिल्खा  भात ' अशी कोटी केली  ! ( पोरगा  हुशार  आहे   )

सर्व रविवारीय वृत्तपत्रांच्या पुरवण्या  वाचून काढल्या . बाल्कनी तून दिसणाऱ्या भव्य मैदानात  रविवारी  भरणारा  साप्ताहिक ' भव्य  क्रिकेट महोत्सव'  पाहिला ! घरात मदत  केली . डोक्याला  भरपूर  तेल  लावले . . देवीच्या  घटाला लागणारी तिळांच्या फुलांची  माळ  तयार केली ..  आणी  गौरी  साठी सकाळी  चहा  केला  ! दीड महिना मला टी  व्ही पाहिला मिळाला नाही . मी हिस्टरी चनेल पाहून ती हौस पूर्ण  केली . 'घर ' या विषयावरील  सुंदर  साप्ताहिक मालिका हिस्टरी वर सुरु आहे . त्यात  काल  विनय पाठक ने वहिदा रेहमान  यांना  त्यांच्या पूर्वजांच्या घरी -गावी नेवून  स्मृतींच्या हिंदोळ्यावर नेले . . डोळ्यात अश्रू आणले .

 गोविंद निहलानींची  'तमस  ' मालिका   पाहिली . उर्मिला पवार यांचे 'आयदान ' वाचून पूर्ण केले .  आदित्य चा अभ्यास घेतला . . ( आणी भरपूर झोप घेतली . . हळीवांचे लाडू खावून ! )

थोडे  संगीत ऐकले  असते  आणी पेंटिंग -फोटोग्राफी केली  असती  तर हा रविवार सुवर्णाक्षराने लिहावा लागला  असता

 पण असा रविवार  चांगला गेला  कि तो  मला  टोचतो ,लगेच  व पु किवा  जयवंत  दळवींच्या  रविवार  वरील एका  कथेची  आठवण होते . .  त्यात असोशीने  रविवार ची वाट  पाहणाऱ्याचा रविवार  कसा  कामे  अंगावर  घेवून  संपून  जातो  ,हे प्रत्ययकारी  लिहिले  होते !  माझे अनेक  रविवार  असे  कामात उडून जातात . .

कालच्या  सारख्या अशा  रविवारीय  संगीत  सभा /वाचन  सभा /कौटुंबिक सभाच हा दिवस अविस्मरणीय  करतात . .

. . . . संडे कब आयेगा  ?

Wednesday, November 13, 2013

लक्ष्मीपूजन ३ :

'प्रबोधन माध्यम ' चे कार्यालय खूप वर्षे एकाच ठिकाणी आहे (सुदैवाने ) . . पण बरीच वर्षे त्याला रंग द्यायला जमला नव्हता . काही दिवसापूर्वी अंगात काही संचारल्यासारखे झाले आणि
एका कार्यालयीन सहकाऱ्याला बरोबर घेवून रविवारी स्वताच्या हाताने कार्यालयाला रंग देवून टाकला !

आज त्या रंगारंग कार्यालयात लक्ष्मीपूजन करताना सजलेल्या भिंती हळूच गालात हसत आल्याचा भास झाला . .

लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे .

लक्ष्मीपूजन !
------------------

लक्ष्मीपूजन करण्याची माझी एक वेगळीच पद्धत आहे . . लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे . . माझ्या कडे चलनात असलेली आणी नसलेली वेगवेगळी नाणी आहेत . . छंद म्हणून जमवलेली !

महाराजांचा होन आहे ,ब्रिटीश नाणी -नोटा आहेत ,त्याच प्रमाणे स्विस आणी इतर देशांचे कॉईन आहे . . मी नेपाळ ,भूतान आणी काश्मीर लगत पाक सीमेवर ,चीन सीमेवर जावून आलो आहे . . पण त्या पलीकडे परदेशात गेलो नाही . . पण परदेशात कोणी
मित्र -नातेवाईक गेले कि मी आवर्जून त्या देशाची एक -दोन नाणी मिळवतो ! त्याचा बरा संग्रह झाला आहे . .

आणी त्यात आणे ,पैसे ,रुपये अशी खूप जुनी नाणी आहेत । खेडे गावात एकट्या राहणाऱ्या माझ्या आईच्या आत्याच्या निधना नंतर मला घरात सापडलेली . . खूप लहानपणापासून आजही मी ती जपून ठेवलीत.
.
त्या नन्तर बारा -पंधरा घरे बदलून सुद्धा हा ठेवा मी जपला आहे

माझ्या पूर्वजांची इष्टेट आहे ती ! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी ती हातात घेतो ,त्यांना न्हावू घालतो ,हृदयाशी धरतो . . पूजा करतो . . आणी हळूच त्यांच्या आशीर्वादाच्या कुशीत शिरू पाहतो. .

तमाच्या तळाशी दिवे लागले !

तमाच्या तळाशी दिवे लागले !
.........................................

. . नॉक औट व्हावे इतके ४ महिन्यांचे काम संपवून आज . रात्री लक्ष्मी पूजनानंतर माझ्या मित्राबरोबर आणि त्याच्या रिक्षा वाल्या मित्राबरोबर जेवायला बसलो . .

तेवढ्यात गौरी चा फोन आला . . आपण ज्या दिवंगत रिक्षा वाल्या मित्राला खूप मदत केली होती ,त्यांच्या पत्नीचा फोन आला होता आणी . . त्या आपल्या घरी दिवाळीची गिफ्ट पाठवत आहेत . .
ऐकून अक्षरश : भडभडून आले . . आपण दिवाळी कुठे पोहोचवली आणि कुठे उगवून आली . . काहीच कळेना . .

तमाच्या तळाशी ,,तळा गाळाच्या तळाशी ...दिवे लागतात तीच खरी दिवाळी . . I SWEAR